पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांच्या मालकी हक्कासाठी तीन वर्षांची मुदतवाढ; मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे – पुणे शहरातील पानशेत पूरग्रस्तांच्या १०३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत वाढ देण्यात आल्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

मिसाळ म्हणाल्या, या विषयासंदर्भात गेली बारा वर्षे पाठपुरावा करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपची सत्ता असताना ८ मार्च २०१९ रोजी तत्कालिन महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागा मालकी हक्क्याच्या करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासाठी १ फेब्रुवारी १९७६ रोजीची ६० रुपये प्रति चौरस मीटर या प्रमाणे जमिनीची बाजारमूल्य किंमत निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि त्यानंतर आलेली कोरोनाचे संकट यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारला पत्र लिहून केली होती.

त्याप्रमाणे आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून त्यासाठी राज्य शासनाचे मनापासून आभार मानीत आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आकारणीची रक्कम भरून या योजनेचा लाभ घ्यावा.