जे ओवेसिला जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले; आशिष शेलार यांची घणाघाती टीका 

मुंबई – कोरोना मध्ये पोयसर मधील जनता शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी धडपडत होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे सरकार याकूब मेमनचे थडगे सुशोभित करीत होते. ज्या पध्दतीने मतांसाठी तुष्टीकरण केले जातेय त्यातील धोका ओळखा…शिवसेनेच्या तुष्टीकरणाच्या अजेंड्याला साथ देऊन तुम्हाला पोयसरचा महमद अली रोड करायचा आहे काय? असा थेट सवाल भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.(Uddhav Thackeray did what Owasi failed to do – Ashish Shelar)

जागर मुंबईचा यातील तेरावी सभा आज कांदवली पोयसर येथे झाली. या सभेला खा. गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातकळकर यांनी संबोधित केले तर भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्य वक्ते म्हणून बोलताना  आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून मराठी मुस्लिम असे तुष्टीकरण आणि लांगूलचालन करून वेगळी चूल मांडली जात आहे. जे ओवेसिला जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले.  मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनचं थडगे यांनी सुरक्षित केले. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्याकडे पुरावे मागितले जातात. औरंगजेबाचे स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले. मातोश्रीच्या अंगणातून सुरू केलेला जागर मुंबईच्या गल्ली गल्लीमध्ये पोहोचला आहे. ते पुढे म्हणाले, २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत.  तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता?  मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला.

प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली?  केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतं मागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिला.