उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे : अमित शाह

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकानंतर भाजपला धोका दिला. राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करु नका. उद्धव ठाकरेंना जमीन दाखविण्याची वेळ आली आहे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे मोठे वक्तव्य करत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह  (Amit Shah) यांनी शिवसेनेला इशारा दिला.

अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर जवळपास 200 पदाधिकारी उपस्थित होते.

कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र आपल्या घरासमोर कानाखाली मारली, तर तिचा आवाज अंर्तमनापर्यंत जाते. आज ती वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे बोलण्यात संकोच नको. राजकारणात धोका दिलेल्यांचे राजकारण यशस्वी होत नाही, असेही अमित शाह म्हणाले.भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

अमित शाह म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. वर्ष 2019 मधे पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं. असं पहिल्यांदाच झालं आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला.