आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले; शरद पवारांविषयी अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar – शपथविधी घेण्याअगोदर आम्ही साहेबांची भेट घेतली त्यांना कल्पना दिली मात्र आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आले असा थेट आरोप करतानाच जो घटनाक्रम घडला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील वैचारिक मंथन शिबीरात सांगितला.

दरम्यान प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील यांना हे सर्व माहित आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

आम्ही दहा – बारा जण देवगिरीला होतो. सुप्रिया सुळे (Supriya Sule) हिला बोलावले आणि आमचा झालेला निर्णय सांगितला. लोकशाहीत बहुमताचा आदर राखला जातो. सात – आठ दिवसात साहेबांशी बोलून सांगतो म्हणाली. आम्ही थांबलोही मात्र तो वेळ गेल्यावर पुन्हा साहेबांना सांगितले. ठिक आहे म्हणाले. वेळ जातोय निर्णय घ्या सांगत होतो. १ मे रोजी मला बोलावून सरकारमध्ये जावा असे सांगितले. मात्र १ मे रोजी सगळे बाहेर असतात म्हणून मग २ मे ला कार्यक्रम ठरला साहेबांनी राजीनामा दिला. मात्र त्यावेळी वातावरण वेगळे निर्माण झाले. तर दुसरीकडे काही लोकांना बोलावून राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करायला सांगण्यात आले. त्यावेळी काही ठराविक टाळकी तिथे होती. मला एक आणि इतरांना वेगळे सांगत होते. ही गोष्ट परिवारातील म्हणून तुम्हाला सांगितले. हे सर्व गाफील ठेवून केले गेले असेही अजित पवार म्हणाले.

२ जुलैला आम्ही घेतलेला निर्णय आवडला नाही तर मग १७ जुलैला आम्हाला का बोलावले? सगळे आमदार घेऊन गेलो. चहापान झाला सगळं सुरळीत होणार आहे असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले गेले. १२ ऑगस्टला उद्योगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करत होतो ना. पक्षासाठी काम करत होतो ना? असा सवाल उपस्थित करतानाच काहीजण आता गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. संघर्ष यात्रा काढत आहे आयुष्यात कधी केला नाही आता कशाला संघर्ष करता असा टोलाही नाव न घेता रोहित पवार यांना लगावला.

जात निहाय गणना होणे गरजेचे आहे त्याशिवाय कुणाला किती आरक्षण द्यायचे हे ठरले जाईल. मात्र आज अठरापगड जातीत भांडणे होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली असून शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचाराचा हाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न सर्वांना पडत आहे असेही अजित पवार म्हणाले.

आज राज्यात काय सुरू आहे याचा विचार केला पाहिजे. कुळवाडी राजा ही उपाधी महात्मा फुले यांनी दिली. कुळवाडी म्हणजे शेतकरी आहे मात्र आज आपण प्रत्येकाला जाती जातीत विभागले आहे. एखाद्या समाजाचा मुलगा पुढे जात असेल तर इतर जातींनी द्वेष का करायचा. हे योग्य नाही असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

प्रत्येकाकडून समाजा-समाजात चितावनी देणारी भाषणे होत आहेत. हे थांबले पाहिजे. यातून दंगली घडल्या तर याला कोण जबाबदार आहे. तरुण, गरीब माणूस यामध्ये भरडला जातो त्याचे आयुष्य उध्वस्त होते. राज्यात दंगली घडत असतील तर हा अजित पवार त्या घडू देणार नाही. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी गरीबाचे रक्त सांडू देणार नाही असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला.

कुणाच्या ताटाखालचे मांजर होण्याचे महाराष्ट्राच्या रक्तात नाही. मात्र आज प्रत्येकाची लायकी काढली जात आहे. ही लायकी स्वकर्तृत्वावर तयार होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळयात जात नसते आणि जातीचा अहंकार नसतो. पण आज जाती जातीत वाद निर्माण केला जात आहे. एकोप्याने राहिलो तरच विकास होऊ शकतो. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हायला हवी ही मागणी आहे असेही आरक्षण मुद्दयावर बोलताना अजित पवार म्हणाले.

वेगवेगळ्या समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची कार्यवाही आम्ही सगळे करत आहोत. आमच्यात मतभेद नाही. उगाच बातम्या आल्या असेही अजित पवार म्हणाले.

निवडणूक चिन्हाबाबत आयोग निर्णय घेईल. आता इथून निघाल्यावर कामाला लागायचे आहे. १२० दिवस शिल्लक आहेत असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

स्वतः ला झोकून देऊन काम करुया एक नवीन इतिहास राज्यात घडवुया असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

आजच्या भाषणात अजित पवार यांनी त्यांना पवारसाहेबांनी कसे गाफील ठेवले आणि सत्तातंराबाबत घडलेला घटनाक्रम सांगून त्यांच्याविरुद्ध येणार्‍या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक लागू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून एनडीए विचाराचे निवडून द्यायचे आहेत. बारामती शिरुर रायगड सातारा या खासदारकी आपण लढवणार आहोतच याशिवाय दुसर्‍याही जागा असतील तर शोधून काढा. त्याठिकाणी भाजप, शिवसेनेशी चर्चा करून प्रश्न सोडवू असे अजित पवार म्हणाले.

पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यावर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसणार आहोत शिवाय घटक पक्षांना सोबत घेऊन जाणार आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आता काळ बदलला आहे. आताच्या लोकांच्या भावना काय आहेत. त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या हे बघितले गेले पाहिजे. आपण आपली विचारधारा सोडली नाही. अल्पसंख्याक समाजाला सांगू इच्छितो उध्दव ठाकरे यांच्यासोबत काम केले. शंभर टक्के काम पूर्ण करु शकलो नाही. महायुती किंवा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर किमान समान कार्यक्रम ठेवून काम करावे लागते. काहीवेळा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र विचारधारा सोडलेली नाही. आपला मुळ पक्ष आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मी विरोधी पक्षनेते पद सोडतो पक्षाची जबाबदारी द्या बोललो होतो याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.

जयंत पाटील यांनी अध्यक्ष पदाबाबत कशी चालढकल केली आणि प्रकाश सोळंके यांना अध्यक्ष पदापासून टोलवाटोलवी कशी केली हा किस्सा सांगत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

एक महिन्यात युवक पदाधिकारी नेमून झाले पाहिजेत. बघतो असे चालणार नाही नाहीतर ३१ डिसेंबरनंतर दुसर्‍यावर जबाबदारी दिली जाईल असे सांगतानाच आता माझ्याबरोबर सगळ्यांना जास्तीचे काम करावे लागणार आहे. सोशल मिडियाचा वापर पुरेपूर केला पाहिजे. नुसत्या बातम्या देऊन पक्ष वाढत नाही तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. संपर्क राहिला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी सर्वसमावेशक असले पाहिजे. सर्व घटकांना सोबत घेऊन काम करा. आपला मुळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ३० तारखेला मला निवडले आहे. कोर्ट कचेरीकडे लक्ष देऊ नका असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

मी स्पष्ट वक्ता आहे मला छक्के पंजे जमत नाही. सर्वगुणसंपन्न शिकून कोण येत नाही. माझ्यापेक्षा युवक युवती टॅलेंट असेल तर त्यांचेही ज्ञान मी घेतले पाहिजे. कमीपणा वाटून घेऊ नका असा दिलखुलास सल्लाही अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी