काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये कधी परतणार? मोदी सरकारला काँग्रेसचा सवाल

मुंबई : काश्मिरी पंडितांबद्दलचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बनवण्याचा उद्देश काश्मीरी पंडीतांबद्दल कणव नाही तर राजकीय आहे. ऐतिहासिक घटनांची मोडतोड व चित्रपट बनवणाऱ्यांचे भाजपाच्या संबंधित असणे हा योगायोग नाही. काश्मिरी पंडीतांनी काश्मीरमध्ये परत कधी जायचे? हे मोदी सरकारला विचारावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात सचिन सावंत म्हणाले की, देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून त्या भळभळत राहतील हे पाहत असते. द्वेषातून सत्तेसाठी मतांचे पीक मिळवण्याचा त्यांचा उद्देश असतो. देशभक्त सरकार नागरिकांमध्ये प्रेम निर्माण करते आणि जुने व्रण विसरायला लावते. एकतेने देश मजबूत होतो. दुर्दैवाने देशात गेले आठ वर्षे देशविरोधी सरकार आहे असे सावंत म्हणाले.

भाजपाने गेले अनेक वर्षे प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काश्मीरी पंडितांना काश्मीरमध्ये स्थापित केले जाईल हे आश्वासन दिले होते आणि ध्रुवीकरणासाठी या मुद्द्याचा उपयोग केला. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीर मध्ये काश्मीरी पंडितांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला अशी बोंब ठोकली. आता काश्मीरी पंडीत कधी परतणार? या प्रश्नाचे उत्तर मोदी सरकारकडे नाही. पण देशात द्वेष पसरवून मते मिळवण्यासाठी भाजपातर्फे अजूनही काश्मीरी पंडितांचा वापर केला जात आहे. या चित्रपटाचे प्रकाशन हा भाजपाचा राजकीय अजेंडा आहे. म्हणूनच मोदी सरकारमधील मंत्री व भाजपा नेते या चित्रपटाचा उदोउदो करत आहेत असा घणाघाती आरोप सावंत यांनी केला.

सदर चित्रपट बघून येणाऱ्या प्रेक्षकांना काही ठिकाणी भाजपा कार्यकर्ते “जय श्रीराम”च्या घोषणा देण्यास भाग पाडत आहेत. पण श्रीरामाने रावणाचा द्वेष केला नाही व कैकेयीला क्षमा केली हे पहा. श्रीरामाने दाखवलेला मार्ग क्षमाशीलतेचा आहे द्वेषाचा नव्हे! जर आठवणच ठेवायची तर ही जरुर ठेवा की पंडितांचे काश्मीरमधून अत्याचारांमुळे जबरदस्तीने विस्थापन झाले त्यावेळी केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती व राज्यपाल जगमोहन होते.

जगमोहन यांच्या वर्तनामुळेच काश्मीरी पंडितांचे विस्थापित झाले व भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकीय मुद्दा मिळाला. जगमोहन यांना बक्षीस म्हणून भाजपाने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.

हेच जगमोहन पुढे भाजपातर्फे तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले व वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही झाले , याची आठवण सावंत यांनी करून दिली. ज्या व्यक्तीमुळे काश्मीरी पंडितांना अत्याचार सहन करावे लागले त्याला राजकीय शिक्षा देण्याऐवजी बक्षीसी का दिली? याचे उत्तर भाजपा नेत्यांनी काश्मीरी पंडितांना द्यावे असे सावंत म्हणाले.