देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार आहेत का? – दिपाली सय्यद 

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (MNS chief Raj Thackeray)  घेतलेली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. मुंबई, ठाण्यातल्या सभा आणि पुण्यातील ‘हनुमान चालिसा’ ( Hanuman Chalisa ) पठणानंतर आता औरंगाबादेतही राज ठाकरेंची सभा होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सभांमधून राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला असून हा मुद्दा केवळ राज्यातच नव्हे तर देशभर चर्चेत आला आहे.

राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर अनेक राज्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली मात्र उत्तर प्रदेशात योगी सरकारने (Yogi Aadityanath) न्यायालायाच्या निकालाचे पालन करण्याचे ठरवले आणि अनधिकृत भोंग्यावर कारवाईचा धडाका लावला. उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे.या कारवाईचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, या मुद्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amrita Fadnavis ) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath) यांची तारीफ करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना धारेवर धरल आहे ” ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से ! ” असं ट्विट करत त्यानीं उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, याला आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर दिलंय. दीपाली सय्यद म्हणाल्या, “योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार आहेत का?” दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांच्यावर घणाघाती शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर आता फडणवीस आणि सय्यद यांच्यात शाब्दिक युद्ध होण्याची शक्यता आहे.