उद्धव ठाकरेंच्या जहरी टीकेनंतर शहाजीबापूंनी त्यांना  दिला ‘हा’ प्रेमाचा सल्ला 

Mumbai – दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) मुलाखत घेतली. शिवसेना आमदारांचा एक गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेले सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण यावर प्रखरपणे उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये बोलताना झाडी-डोंगर फेम शहाजी पाटील यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला.उद्धव ठाकरे म्हणाले, झाडी, डोंगार, हाटील महाराष्ट्रात नाही का? किती सुंदर आहे महाराष्ट्र. ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. मला एक कळलंच नाही की मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही.

मी स्वत: कलाकार आहे. त्यावरुन सुद्धा चेष्टा झाली होती. मी पंढपुरच्या वारी, गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. त्यावेळी महाराष्ट्र पाहिला तर इतका नटलेला, थटलेला दिसतो. आम्ही तर शहरीबाबू आहोत, तुम्ही ग्रामीण भागातील आहात. पण ग्रामीण भागात राहूनही तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य कधी दिसलं नाही, त्याचं वर्णन करावंसं वाटलं नाही आणि थेट गुवाहाटी दिसलं. मी गुवाहाटी वाईट म्हणत नाही, प्रत्येक प्रदेश चांगला आहे. पण हे मातीसाठी काय करणार?, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेला आता शहाजी पाटील यांनी उत्तर दिले आहे.उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशी वक्तव्य करु नये, असा सल्लाच शहाजीबापू पाटलांनी दिला आहे. चाललेल्या राजकारणामध्ये जो काही संघर्ष सुरू आहे. आज त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी उदात्त मनाने एक पाऊल मागे घ्यायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा महान विचार करावा, अशी विनंतीही शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केली. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी चांडाळ चौकडीपासून दूर राहावं, असा सल्ला त्यांनी दिला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या पक्षाला विरोध केला त्या पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून ते बसले. पण आता हिंदूत्वासाठी भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवली होती, त्यामुळे एकत्र येत असताना त्यांचाही विश्वास तोडता कामा नये, असा सल्लाही पाटील यांनी दिला.