भाजपचा आक्रमक पवित्रा कायम; राहुल गांधींच्या विरोधात शनिवारी भाजपाचे राज्यभर आंदोलन

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी करून ओबीसींचा अपमान केला. त्यांचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी (ता.२५) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रासह दक्षिण मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन होईल. तसेच राज्यभरात भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (BJP Mumbai President Adv. Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राहुल गांधी यांनी केलेले विधान ओबीसी समाजाला हिनवणे टोमणे मारणे या अर्थाने होते. त्यावर ओबीसी समाजाची मंडळी कोर्टात गेली. त्यांनी दावा दाखल केला. त्यातील सर्व न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांना कोर्टाने सजा दिली. सर्व घटनात्मक संविधनात्मक प्रक्रिया झाल्यानंतर दोषी सिद्ध झाल्यावर शिक्षा झाली. लोकशाही प्रक्रियेनुसार शिक्षा झाली आहे. राहुल गांधी यांनी देशाची बदनामी भारताच्या भूमी बाहेर जाऊन केली आहे. हे कदापि भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. त्यावर राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. ओबीसी समाजाच्या बदनामीचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. त्यांनी ओबीसी समाजाचीही माफी मागितली पाहिजे. त्यासाठीच राज्यभर आंदोलन होणार आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार आंदोलन होणार आहे. सर्वसामान्यांच्या भावना तीव्र आहेत. ज्या राहुल गांधींनी भारताचा अपमान भारताबाहेर जाऊन केला त्याच्या निषेध प्रत्येकाने केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्या विषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ॲड. आशिष शेलार म्हणाले, ज्यांचा नागरिकशास्त्राशी संबंध नाही त्यांनी लोकशाही वगैरे शब्द प्रयोग करू नये. नागरिकशास्त्र हे फोटो कॅमेरातून शिकता येत नाही. ते उघड्या डोळ्यांनी शिकावे लागते. उद्धव ठाकरेंकडून लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात बोलले जात आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी त्याबाबत उद्धव ठाकरेंना शिकवणी देण्यासाठी तयार आहे. त्यांना शिकवणीची आवश्यकता आहे. ओबीसी समाजाची बदनामी करणे; त्यांना हिणवणे हा गुन्हा आहे याची माहिती उद्धव ठाकरेंना नाही. त्यांनी शिकून घ्यावे नाहीतर आमची शिकवणी लावावी अशीही टीका त्यांनी केली. भारतीय संविधानानुसार कुठल्याही समाजाची बदनामी झाल्यास त्या समाजातील व्यक्तीला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे हे उद्धवजी यांना माहित नाही म्हणूनच त्यांना शिकवणीची गरज आहे.

न्यायालयात झालेला निवाडा बंधनकारक असतो याचीही त्यांना माहिती नाही. न्यायालयाने शिक्षा दिल्यावर भारतीय संविधानाने संसदेत केलेला कायदा लागू होतो याची त्यांना माहिती नाही म्हणून त्यांना शिकवणीची गरज आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना नागरिक शास्त्राचे पुस्तकही पाठवू. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे बोलायला त्यांची ही काही उरलेली शाखा नव्हे असा टोलाही भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी लगावला.