संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू- महिला मुंबई अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर

मुंबई: मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडवत असतात. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi), महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल केलेल्या आशा वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर (Surekha Pednekar) यांच्याकडून निषेध करत आंदोलन केले आहे. तसेच संभाजी भिडे यांना तत्काळ राज्य सरकारने अटक करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांनी भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत निदर्शन केले. भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली आहे. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजाराम मोहन रॉय यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल भिडे यांचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

देव देवतांबद्दल आणि महापुरुषांबदल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून संभाजी भिडे जनतेमध्ये दिशाभूल करण्याचे काम करत आहे. संभाजी भिडे हे भाजप सरकारने सोडलेले पिल्लू आहे. संभाजी भिडे यांनी साईबाबा देवस्थानाबद्दल पूजा करू नका असे म्हटले आहे तसेच त्यांनी महापुरुषांबद्दल अनेकदा वादग्रस्त वक्तव्य देखील केलेले आहे. मात्र सध्याचे राज्य सरकार संभाजी भिडे यांना पाठीशी घालत असून त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटनेच्या वतीने आज संभाजी भिडे यांना सरकार राज्य सरकारने अटक करावी याकरिता आंदोलन करण्यात आले आहे. संभाजी भिडे हे या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. या किड्याला पायाखाली चिरडून मारण्याची वेळ आली आहे. या दोन दिवसांमध्ये त्यांना जर अटक केले नाही तर यापुढे आंदोलन तीव्र स्वरूपात करू असा इशारा राष्ट्रवादी महिला मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेला आहे.