बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात येईल, आयुक्तांकडून आश्वासन

Diwali Bonus: मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट मधील कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणीची पाहणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली होती. त्यानंतर या सर्व मागण्यांकरिता महापालिका आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे देखील म्हटले होते. त्यानुसार आज आयुक्त यांची भेट घेण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या अनेक मागण्या पूर्ण करण्यात आल्याचे माहिती आयुक्तांनी दिली आहे असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बेस्ट मधील कंत्राटी तसेच कायम कर्मचार्‍यांनाही बेस्ट ने पास दिला आहे, ही आनंदाची बाब आहे. दुसर्‍या गोष्टी जसे की स्वच्छतागृहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर यासंदर्भातही वरिष्ठ जातीने लक्ष घालणार आहेत. यासाठी त्यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. एक महिन्यानंतर मी स्वत: त्याबाबत आढावा घेणार आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बेस्टच्या बाबत केंद्राने प्रिपेड मीटर संदर्भात जो निर्णय घेतलाय त्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली यामध्ये केंद्राने जे राज्य सरकारला निर्देशित केले आहे, त्याची माहिती आत्ता राज्य सरकारही घेत आहे. त्यामुळे याबाबतची माहिती थोड्याच दिवसांत सर्वसामान्यांना कळेल असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

मुंबईतील प्रदुषणाबाबतही त्यांनी पाठपुरावा केला. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, बेस्टच्या वरिष्ठांनी याबाबत काही कायदे, नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे. त्याचाही आम्ही सगळे अभ्यास करु. मुंबईमध्ये वायू प्रदूषणामुळे वयोवृद्धांसह लहान मुले, महिला यांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिकेसह सरकारनेही गांभीर्याने काही निर्णय घेण्याची गरज आहे.
कंत्राटी कर्मचार्‍यांच्या दिवाळी बोनस संदर्भात त्या म्हणाल्या, कर्मचार्‍यांना अपेक्षेपेक्षा जास्त बोनस देण्याचे आयुक्तांनी आश्‍वासन दिले आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावही त्यांनी पाठवला आहे. त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे, तर आपण एक महिना थांबून वाट पाहूया.

मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे भ्रष्ट सरकार आहे, जुमलेबाज सरकार आहे. ३० दिवसांची मुदत ते पूर्ण करु शकले नाहीत. आज जारंगे पाटलांच्या मनाचा मोठेपणा होता, म्हणून या सरकारला अजून १० दिवसांचा कालावधी दिला. मात्र, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाला केवळ फसवण्याचे काम या सरकारने केले आहे. हे सगळे पाप भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मिळून केले आहे. आज सरकारने महिला, आरक्षण, महागाई, बेरोजगारी अशा कितीतरी प्रश्‍नांवर हे ट्रिपल इंजिन खोके सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. २०० आमदार आणि ३०० खासदार त्यांच्याकडे आहेत. तरीही ते प्रश्‍न सोडवू शकत नाहीत? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव, मुंबई प्रदेश युवक अध्यक्ष ॲड निलेश भोसले, BEST कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत, महेंद्र साळवे सरचिटणीस SC / ST / VJ / NT BEST कर्मचारी संघटना, उपाध्यक्ष अमित हिंदळेकर , सचिन नारकर उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!