पोटनिवडणुकीत भाजपाने माघार का घेतली? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले नेमके कारण

नागपूर – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) निवडणूक अर्ज मागे घेतील. कै. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजपाने हा महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार निर्णय घेतला, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूर येथे पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाची तयारी पूर्ण झालेली आहे. अपेक्षित मते मिळवून भाजपा ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आहे. तथापि, एखाद्या आमदाराचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी निवडणूक लढवत असेल तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्रात संस्कृती आहे. भाजपाने यापूर्वी अनेकदा असा निर्णय घेतला आहे. तसेच नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराला जेमतेम एक दीड वर्ष कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आज पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सांगितले की, हा निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतला आहे. राज्यासाठी संवेदनशील निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे आपण आभार मानतो.