हवामान बदलाचा मुंबईला धोका; आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांचा निर्वाळा

मुंबई – पावसाचा अतिरेक, वाढते शहरीकरण, समुद्राच्या पातळीत सातत्याने होणारी वाढ ही हवामान बदलामुळे मुंबईसमोर समोर उभी ठाकलेली आव्हाने आहेत. परिणामी, भविष्यातील काळ हा मुंबईच्या एकूणच आरोग्याच्या दृष्टिकोनातून खडतर असल्याचे निरीक्षण आयआयटी मुंबईतील क्लायमेटिक स्टडीजचे प्रा. सुबिमल घोष यांनी मांडले.

विलेपार्ले येथील बी.जे. सभागृहात ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशन या मुंबईस्थित स्ट्रॅटेजिक रिसर्च थिंक टँकने आयोजित मंगळवारी पार पडलेल्या “इंडिया वॉटर व्हिजन 2040 अँड बियॉन्ड” या राष्ट्रीय जल परिषदेत ते बोलत होते. घोष यांनी हवामान बदलाचा मुंबईवर होणारा परिणाम विशद करताना सांगितले, मुंबईत मागील काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढत असून याचा परिणाम शहराच्या समुद्रकिनाऱ्यावर होत असून पूरजन्य स्थिती निर्माण होत आहे. शिवाय, बदलत्या हवामान बदलामुळे आरोग्यावरही परिणाम होत असून भविष्यात हे संकट गडद होणार आहे.

दरम्यान, लेफ्टनंट जनरल पी जी कामथ यांनी भारत – पाक इंडो चायना जलसंपत्तीच्या परिस्थितीवर विस्तृतपणे विश्लेषण मांडले . चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलेल्या गौतम बंबावाले जल लाभांशबद्दल माहिती दिली.  शिरपूर पॅटर्नचे एक प्रणेते सुरेश खानापूरकर आणि प्रख्यात भूगर्भशास्त्रज्ञ यांनी भूजल पुनर्भरण तसेच जलसंधारणाच्या यशाबद्दल सांगितले. पुणे येथील शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे यांनी हवामानातील बदल आणि देशावर विशेषतः मुंबई आणि किनारपट्टीवरील पाण्याचा परिणाम या विषयावर भाष्य केले. मैत्री एक्वाटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन माथूर यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल सांगितले तर अखेरीस द रेनवॉटर प्रोजेक्टच्या संस्थापिका कल्पना रमेश यांनी जलसंधारणाची यशोगाथा विशद केली.

पावसाच्या उत्पादन मूल्यात घट

मुंबईतील काही भागांत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक असते. हवामान बदलामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी जास्त झाले आहे. परिणामी, शहर उपनगरातील पावसाच्या पाण्याचे उत्पादन मूल्य कमी झाल्याने या पाण्याचा पुर्नवापर करता येत असल्याची खंत घोष यांनी व्यक्त केली.

आयआयटी मुंबईत संशोधन

आयआयटी मुंबईत हवामान बदलाविषयी संशोधन सुरु असून यावर गेल्या दहा वर्षांपासून याविषयी अभ्यास सुरु आहे. याविषयीचे संशोधन अहवाल राष्ट्रीय स्तरासह स्थानिक यंत्रणांना पाठविले जातात, त्यानंतर संबंधित यंत्रणांकडून धोऱणात्मक कृतिशील आऱाखडा तयार करण्यासाठी याचा आधार घेतला जातो.