जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत – फडणवीस

मुंबई: राज्यातील आघाडी सरकारने आम्हाला पहिल्यांदाच चहापानाचं आमंत्रण दिलं आहे. पण राज्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. हे सरकार कोणत्याच मुद्द्यावर संवेदनशील नाही. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच हिवाळी अधिवेशनात राज्यातील 8 प्रमुख मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीस म्हणाले, निलंबित करण्याची गरज नसताना केवळ आवाज बंद करण्यासाठी आणि सरकार केव्हाही धोक्यात येऊ शकते, याची भीती असल्याने आमचे १२ आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले.राज्यसभेतील निलंबन आणि विधानसभेतील निलंबन यात मोठे अंतर आहे. तेथे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. प्रकरण समितीपुढे गेले, पुरावे गोळा केले गेले आणि नंतर निलंबन झाले, तेही एका अधिवेशनासाठी. याला लोकशाही म्हणतात. महाराष्ट्रात यापैकी काहीच झाले नाही, याला तानाशाही म्हणतात. अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी आमची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय.

ओबीसी आरक्षण प्रश्नावर हे सरकार सुप्रीम कोर्टात उघडे पडले. आधी सांगत होते, केंद्राचा डेटा मिळत नाही आणि आता सांगतात तीन महिन्यात तो गोळा करतो. यांच्या नाकर्तेपणामुळे हे ओबीसी आरक्षण गेले. आम्ही आवाज उठवणार आहोत असं ते म्हणाले.शेतकऱ्यांप्रति हे सरकार असंवेदनशील आहे. कोणती मदत नाही, पीक विमा कंपनीच्या घशात घातला.महाराष्ट्र हे एकमेव राज्य जे पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करीत नाही, आणि दारूचे दर कमी करते. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे.महिला अत्याचार प्रचंड वाढले.परीक्षांचे घोळ इतके आहेत की त्याची सीबीआय चौकशी व्हायला हवी, तरच खरे सूत्रधार बाहेर येतील असा दावा देखील त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले, कुलगुरूंचे अधिकार कमी करणारा कायद्याला आम्ही कडाडून विरोध करू. विद्यापीठ ताब्यात घेणारा कायदा देशात कोणत्याही राज्याने केलेला नाही. कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला.हे सारे घोटाळे बाहेर काढू.आमचा भर चर्चेवर असेल, गोंधळ घालण्यात आम्हाला रस नाही. मोदी सरकारने दिलेले पैसे शेतकऱ्यांना अजून महाविकास आघाडी सरकारने दिलेले नाही आणि रोज सकाळी खोटे बोलत बसायचे की केंद्र सरकार पैसे देत नाही, याचाही पर्दाफाश करणार. मुख्यमंत्र्यांना लवकर बरे होण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच. पण गेल्या २ वर्षांपासून राज्यात सरकारचे अस्तित्व आहे तरी कुठे?

शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिवभोजन योजना सुरु करण्यात आली. महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार.हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.