‘सबसे कातील’च्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण, राष्ट्रवादीकडून गौतमीवर नाशिक जिल्हा बंदी आणण्याची मागणी

Nashik : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरण ठरलेलेच आहे. गेल्या काही महिन्यात गौतमीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तरुण अगदी झाडांवर, घराच्या छप्परवर चढून गौतमीचा कार्यक्रम पाहात असतात. यादरम्यान बऱ्याचदा हुल्लडबाजी करत गोंधळ, मारामारी झाल्याची चित्रेही पाहायला मिळाली आहे. मात्र आता गौतमीच्या नाशिकमधील कार्यक्रमात चक्क दोन पत्रकारांना तरुणांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. दोन्ही पत्रकारांवर सध्या उपचार सुरू असून या प्रकरणी शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांच्याकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातदेखील गोंधळ झाला आणि खुर्च्या उलटवण्यापर्यंत प्रकार घडले होते. तरुणांना नियंत्रित न करता आल्याने हा प्रकार घडला होता. आता मंगळवारी हाच प्रकार घडला. त्यामुळे गौतमी पाटील आणि गोंधळ ही परंपरा कायम राहिली. नाशिकमध्ये झालेल्या गोंधळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा हा कार्यक्रम त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल दोन तास विलंबाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मर्यादित होते. मात्र सर्वच प्रेक्षक स्टेजजवळ जमा झाल्याने एकच गर्दी झाली होती. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था असली तरी कार्यक्रमाला आलेल्यांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पाहण्यासाठी कोणताच अडथळा नको होता. याचवेळी कार्यक्रमाचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेले दोन्ही पत्रकार हे व्यासपीठाजवळ जातच तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली.

यावेळी हुल्लडबाज तरुणांनी उपस्थित पत्रकारांचे पाय ओढण्यास सुरवात केली. त्यामुळे दोन्ही पत्रकारांना व्यासपीठावरून पाय धरून खाली ओढण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली. यावेळी इतर उपस्थित तरुणांनी या दोघांना मारहाण केली. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून तसेच कॅमेऱ्याचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यावेळी बंदोबस्तास असलेले पोलिस मुळात कार्यक्रमाच्या या गोंधळाच्या ठिकाणी नव्हते. व्यासपीठावरून सूचना केल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.