मी वंशज, पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – खा. युवराज संभाजीराजे छत्रपती

नाशिक :- छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj ) यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar)  यांनी घटनेची निर्मिती करून आरक्षण दिले. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं आहे. मी त्यांचा वंशज असून त्यांनी केलेलं काम पुढे अविरत सुरु ठेऊन बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचे माझे प्रयत्न आहे. मी जरी वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला असून ते त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे प्रतिपादन खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज केले. तर बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकमेकांना ताकद देऊ असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ (chagan Bhujbal) यांनी यावेळी केले.

खा.युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrpati) यांनी नाशिक येथे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दिलखुलास पणे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, करण गायकर, योगेश निसाळ, विलास पांगरकर, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधतांना खा.युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, नाशिक येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली होती. त्यावेळी घरी येणार अस मी त्यांना सांगितलं होत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. आज नाशिक येथे कार्यक्रमानिमित्त आलो असता त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा जुना संबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. तसेच पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीत काम करणारे सत्यशोधक गणपतराव मोरे यांना त्यांच्या कामाबद्दल अधिक बळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांच्या दि.६ मे रोजी असलेल्या स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा झाली असून या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी ही संधी असून त्यादृष्टीने आमच्याकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी जरी छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पहिल्यापासूनच समाजात रुजवीत असून ते त्यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी हा कुठलाही वाद नाही बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. फार थोडे लोक असा वाद करतात त्याला आपला विरोध आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.