राज्यात इन्फलुएंझा आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य यंत्रणा सतर्क

Mumbai – राज्यात इन्फलुएंझा (Influenza) आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य(Health) यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन तत्काळ उपचार घ्यावेत, असं आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी केलं आहे. H3N2 फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री सावंत यांनी काल विधानसभेत निवेदन केलं. सावंत म्हणाले की राज्यात एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत असून, अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे.

इन्फ्लूएंझा ए विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी आढळून येतात. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करून मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करण्यात येतात. 13 मार्च अखेर राज्यात H1N1 बाधित 303 रुग्ण आणि H3N2 बाधित 58 रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वे पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील शहरी भागात दिसून येत आहे. राज्यातील रुग्णालयात संशयित रुग्णांना आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत असून, उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.