‘उद्धव ठाकरे हे काय पाकिस्तानचे आहेत का? राणे साहेबांनी फोन केला तर काय चुकलं?’

मुंबई : किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या वादात आता नारायण राणे यांनी देखील उडी घेतली आहे. चुकीच्या कामामुळे घाबरून त्यांना आता घाम फुटला होता, खंर तर हे सांगण्यासाठी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.

नारायण राणे यांच्या टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?’ असा घणाघात मिलिंद नार्वेकर यांनी केला आहे.

दरम्यान, मिलींद नार्वेकर यांच्यावर आता भाजपनेते निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर, अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे.

नारायण राणे यांनी मिलींद नार्वेकरांना फोन केल्याच्या ट्विटला उत्तर देताना, साहेबांनी फोन केलाही असेल तर काय अडचण आहे का? उद्धव ठाकरे हे काय़ पाकिस्तानचे आहेत का? फोन करण्यात काय चुकलं? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मेन कलाकार बघून घेतील, हे साईड अॅक्टरचे काम नाही, असा टोलाही त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे.