‘दिल्लीश्वर कितीही कपटी, कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही’

पुणे : आज तळागाळात पक्ष उभा होत आहे…एक -एक कार्यकर्ता पक्षाशी जोडला जात आहे…आज पक्षाकडे तरुणांची मोठी फळी निर्माण झाली आहे… त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा राष्ट्रवादीमय असणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मावळ येथे व्यक्त केला. यावेळी जयंत पाटील यांनी भाजपच्या कपटी कारवायांवर जोरदार निशाणा साधला.

ही मावळची भूमी आहे… इथली माती शिवरायांचे शौर्य आपल्याला सांगते… दिल्लीश्वर कितीही कपटी असला कितीही कारस्थानी असला तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही. ही परंपरा शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू आहे ती यापुढेही कायम राहिल असा आत्मविश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

आपलं सरकार काहींच्या डोळ्यात सलत आहे त्यामुळे आधी आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मंत्र्यांवर धाडी टाकल्या जात आहे.अनिल देशमुख यांना खोट्या आरोपात गोवलं…नवाब मलिक यांना खोट्या आरोपात गोवलं…नवाब मलिक एनसीबी विरोधात बोलत होते म्हणून त्यांना त्यांची भूमिका मांडू न देता अटक करण्यात आली. जाणिवपूर्वक दाऊदचं नाव घेतले गेले आणि एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला तुरुंगात टाकले असेही जयंत पाटील म्हणाले.

तुम्ही याची नोंद घ्या, आम्ही ठामपणे सांगतो की, महाविकास आघाडी ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आली आहे. कोणीही किती अडथळे आणले तरी महाराष्ट्र सरकार आपले काम पूर्ण करणार असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आमच्या पक्षात आता सुनील शेळके, रोहित पवार, निलेश लंके असे तरुण लोक नेतृत्व करत आहे आणि चांगली जबाबदारी पार पडत आहे. तुमच्या सर्वांच्या ताकदीने सुनीलअण्णा शेळके जवळपास १ लाख मतांच्या लीडने निवडून आले. ९०० कोटींचा त्यांनी निधी मिळवला आहे अजून अडीच वर्षे बाकी आहेत. मावळचा कायापालट करण्याचे काम करू कारण तुमचा माणूस हा माणसासाठी झटणारा नेता आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

संकटाचा काळ आता संपलेला आहे, आता काळ आपल्या प्रगतीचा आहे आणि या मावळचा विकास सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली होईल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.