महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ – जयंत पाटील

मुंबई   – मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र सर्वांगीण महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ कारण महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

सत्तेचा सदुपयोग करून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याऐवजी सत्तेला हुकूमशाहीचे अस्त्र मानून त्याचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यासाठी केला जातोय असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.