Nana Patole | केंद्रात १० वर्ष सत्ता असताना नरेंद्र मोदींना एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण का झाली नाही ?

Nana Patole | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका आल्या की दलित, आदिवासी, ओबीसी, गरिब लोकांची आठवण येते. १० वर्षात या समाजासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही. १० वर्षात या समाज घटकांवर अनन्वित अत्याचार केले गेले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मोदी सरकारमुळेच गेले आहे. आदिवासींच्या जमिनी हिरावून घेऊन उद्योगपतींच्या घशात घातल्या, गरिबांना अधिक गरिब बनवले आणि लोकसभेच्या निवडणुका सुरु झाल्या की एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण झाली का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेक येथील प्रचार सभेत काँग्रेस व इंडिया आघाडीवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, १० वर्षात एससी, एसटी, आदिवासी समाजाचा विकास केला हा मोदींचा दावा खोटा आहे. उलट मोदी सरकारने मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या बजेटमध्ये कपात केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केल्याचे सांगताना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घटनापासून वंचित ठेवले, अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यापासून वंचित ठेवून देशाच्या राष्ट्रपती, महिला व आदिवासी समाजाचा अपमान केला असताना कोणत्या तोंडाने नरेंद्र मोदी आदिवासींचा सन्मान केला असे सांगतात. गरिब समाजाला विकासाचा लाभ पोहचला असता तर ८० कोटी जनतेला ५ किलो मोफत रोशन द्यावे लागले नसते. ५ किलो मोफत धान्य देऊन १० वर्ष एससी, एसटी, आदिवासी व गरिब लोकांची मोदी सरकारने महागाई करुन प्रचंड लुट केली, या समाजाला जगणे कठीण करुन ठेवले आहे.

नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा आपण गरिब समाजातून आल्यानेच विरोधक आपल्याला शिव्या देतात असे सांगून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु २० लाख रुपयांचा सूट, ३ लाखांचा चष्मा, १.५ लाखांचा पेन आणि ८ हजार कोटींचे विमान वापरणारे नरेंद्र मोदी गरिब कसे? हा प्रश्न देशातील गरिब जनतेला पडला आहे, अशी गरिबी या समाजाला का लाभली नाही? ह्याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण काँग्रेसने संपवले हा नरेंद्र मोदी यांचा आरोपही खोटा व दिशाभूल करणारा आहे. भाजपाची मातृसंस्था आरएसएसला संविधान, देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यापासूनच मान्य नाही. संविधान बदलण्याची भाषा संघ परिवार व भाजपाचे नेतेच सातत्याने करत असतात. लोकसभा निवडणुका सुरु होताच अनंतकुमार हेगडे या भाजपा नेत्याने ४०० पार चे बहुमत आले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागारानेही संविधान बदलले पाहिजे असे स्पष्ट केले आहे, असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान मोदी व भाजपाला शोभत नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

मागील १० वर्षातील मोदी सरकारचा कारभार हा शेतकरी, कामगार, महिला, तरुणवर्ग यांना उद्ध्वस्थ करणारा ठरला आहे. देशात ४० वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आहे, मोदी सरकारने नोकर भरती केली नाही तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आणि १० वर्ष हा तर ट्रेलर आहे असे म्हणतात, पण हा ट्रेलरच जनतेला देशोधडीला लावणारा असेल तर जनता पुन्हा भाजपा व एनडीएला मते कशाला देईल. १० वर्षातील मोदी सरकारच्या पापाची शिक्षा जनता या लोकसभा निवडणुकीत देऊन त्यांना घरी बसवेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके