पालकांनी मुलांना शाळेत जायची परवानगी द्यावी – टोपे

मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी शाळेतले प्रत्यक्ष वर्ग आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यभरातल्या पालकांची मागणी, कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं कमी असलेलं प्रमाण यासारख्या कारणांमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शाळांमधले प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या काही भागात पूर्वप्राथमिक वर्गापासूनच्या शाळा आजपासून सुरू होणार आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जगभरातली परिस्थिती पाहून आणि लहान मुलांबाबतच्या कृती दलाशी चर्चा करुन घेतला आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत जायची परवानगी द्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पालकांना केलं आहे. शाळा सुरू करताना सर्व खबरदारी घेतली जात आहे, शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

राज्यात लसीकरणाचं प्रमाण वाढतं आहे. कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं किंवा अतिदक्षता विभागात दाखल करावं लागण्याचं प्रमाण कमी आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तरी हळूहळू निर्बंध शिथिल केले जातील, असं ते म्हणाले