5G in India : भारतात आजपासून 5G चा शुभारंभ, ‘या’ 13 शहरांमध्ये सुरु होणार सेवा
नवी दिल्ली – अखेर देशातील 5G सेवांची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी देशाला 5G सेवेची भेट दिली. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू झालेल्या इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2022) मध्ये पंतप्रधान मोदींनी रिमोटचे बटण दाबून देशात 5G सेवा सुरू केली. यासोबतच पंतप्रधानांनी इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 च्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटनही केले.
कार्यक्रमात, पंतप्रधान मोदींनी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या दूरसंचार ऑपरेटरकडून 5G नेटवर्कच्या रोलआउटशी संबंधित माहिती घेतली. दरम्यान, रिलायन्स जिओ आणि एअरटेलने आधीच ऑक्टोबरपासून देशात 5G आणण्याची घोषणा केली आहे. मोबाईल कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये पुढच्या पिढीतील 5G नेटवर्कमुळे वेग 4G पेक्षा खूप जास्त असेल. असे मानले जाते की 5G रोलआउटसह, देशात क्लाउड गेमिंग, AR/VR तंत्रज्ञान, IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) इत्यादींमध्ये वेग असेल.
Historic day for 21st century India! 5G technology will revolutionise the telecom sector. https://t.co/OfyAVeIY0A
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2022
दरम्यान, देशातील 13 प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्क प्रथम आणले जाईल. या यादीत दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर यांचा समावेश आहे. येत्या 2 ते 3 वर्षांत देशातील प्रत्येक शहर, गाव आणि तहसीलमध्ये 5G कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.