परराज्यात गेलेल्या प्रकल्पांबाबतच्या श्वेतपत्रिकेबाबत उत्तर द्या; माधव भांडारी यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Mumbai – फॉक्सकॉन, एअरबस ,सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने द्यावे असे आव्हान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी बुधवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते.

यावेळी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण व प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. भांडारी यांनी सांगितले की, पररराज्यात गेलेल्या प्रकल्पांबाबत राज्याच्या उद्योग विभागाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध होऊन पाच दिवस उलटले तरी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबद्दल ‘ब्र’ देखील काढलेला नाही. या श्वेतपत्रिकेतून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यातून उद्योग कसे बाहेर गेले हे कळून येते.

भांडारी म्हणाले की, अनेक महिन्यांपासून उद्योग परराज्यात गेल्यावरून मविआचे नेते बिनबुडाचे आरोप करत होते. प्रत्यक्षात मविआ सरकारचा वसुली कारभार आणि निष्क्रीयता यामुळेच प्रचंड रोजगार देण्याची क्षमता असलेले उद्योग परराज्यात गेले. गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवत आपले उद्योग परराज्यात स्थापित का केले याची इत्थंभूत माहिती महायुती सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सादर केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये आहे असे भांडारी म्हणाले.

नाणार प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्को या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. नाणार प्रकल्पाला विरोध करण्यामागचा नेमका उद्देश https://youtu.be/OGvs-m0e7hMकाय होता असा सवाल देखील भांडारी यांनी केला. महायुती सरकारच्या पारदर्शक व गतिमान कारभारामुळे आजमितीला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक होत आहे. आता गुंतवणूकदारांकडून कोणीही हप्ते मागत नसल्यामुळेच अधिकाधीक उद्योग राज्यात येत असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात पुन्हा अव्वल क्रमांकावर आले आहे, असे भांडारी यांनी नमूद केले.