एकच दणका बसला तर आईचं दूध आठवेल; तानाजी सावंत राष्ट्रवादी-काँग्रेसवर बरसले

सोलापूर – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा काही मुद्द्यांवरुन मतांतर असल्याचं पहायला मिळतं. सध्या निधी वाटपावरुन महाविकास आघाडीमधील या पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं चित्र असून त्याबद्दल जाहीर भाष्य केलं जात आहे. यातच आता शिवसेनेमुळे सत्तेत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिवसैनिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री तानाजी सावंत यांनी खळबळ उडवून दिली आहे.

सोमवारी सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. तानाजी सावंत यांनी या कार्यक्रमात बोलताना मागील अडीच वर्षात शैवसैनिकांना फोडल्याचे दाखले दिले. तसंच ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी पाहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यांच्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असं ठरलेलं असताना असं का होतं? आमच्या नादी लागू नका, तुम्ही 100 मारले आणि आमचा एकच दणका बसला तर आईचं दूध आठवेल, असा इशाराच तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिलाय.

मागील अडीच वर्षात केवळ अपमानच होत असेल तर विचार करायला हवा. आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही. सत्तेत आमच्यासोबत आहात तर आमच्यावर वार का करता? त्यांचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आम्हाला काय? शिवभोजन थाळी चालवा, महिन्याचे बिल येण्याची वाट पाहा. भाजपसोबत सत्तेत असतानाही हेच होत होतं आणि आताही तेच होतंय, अशा शब्दात सावंत यांनी आपली खंत व्यक्त केलीय.