आत्तापर्यंत मी शांत होतो, पण असंच सुरु राहिलं तर…; संजय राठोड यांचा निर्वाणीचा इशारा 

Mumbai – मंत्रिमंडळात (Cabinet Expansion) संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा समावेश झाल्यानं भाजप नेत्या चित्र वाघ यांनी टीका करत आपल्याच सरकारला घराचा आहेर दिला. त्यानंतर आता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात बंजारा समाज आक्रमक झालाय. बंजारा समाजाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. चित्र वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, असेही आवाहन समाजाने केलंय.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राठोड यांनी उत्तर दिलं आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. चित्रा वाघ यांना माहिती नसावं. त्यांना कागदपत्रं पाठवण्याची व्यवस्था करु. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली आहे. न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर विश्वास असल्याने मी आतापर्यंत शांत होतो. सर्व सत्य बाहेर आलं आहे.

मी नको ते भोगलेलं आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, माझाही परिवार आहे, पत्नी आहे, मलाही मुलंबाळ आहेत, वयस्कर आई-वडील आहेत. एखाद्याला किती त्रास होतो याचा आपणही विचार केला पाहिजे. मी चार वेळा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलो आहे. तसं असतं तर जनतेने मला निवडून दिलं नसतं , असं संजय राठोड म्हणाले आहेत. आत्तापर्यंत मी शांत होतो, पण असंच सुरु राहिलं तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार, नोटीसही देणार, असा इशारा संजय राठोड यांनी यावेळी दिला.