गाडीत माझ्यासोबत बहीण-पत्नी नसती तर खाली उतरून एक घाव दोन तुकडे केले असते : बांगर

हिंगोली : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar ) यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. संतोष बांगर हे काल अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर बुक्क्या मारत हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगांव सुर्जी येथे येताच कार्यकर्ते वाहतांना आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले.

दरम्यान,  या हल्ल्यानंतर संतोष बांगर हे प्रचंज आक्रमक झाले आहेत. त्यावेळी गाडीत माझ्यासोबत माझी बहीण आणि पत्नी नसत्या तर मी खाली उतरून संतोष बांगर (Santosh Banger) काय आहे, हे दाखवून दिले असते. एक घाव दोन तुकडे केले नसते तर स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक म्हणवून घेतले नसते, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी व्यक्त केली. संतोष बांगर हे कुटुंबीयांसोबत देवदर्शनासाठी गेले असताना हा हल्ला झाला होता. हा हल्ला म्हणजे ठरवून केलेले एक षडयंत्र असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत फोनवरून संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार बांगर यांनी स्पष्ट केले.