गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही, मग आज ..; शरद पवारांचा भाजपवर निशाणा 

 केरळ – वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar0 यांनी केरळमधील (Kearala) एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं. याच दिवशी केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी या मशिदीसंदर्भात वक्तव्य केलं आहे.

ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवार म्हणाले,वाराणसीत मंदिर आहे. मंदिराला कुणाचा विरोध नाही. पण मंदिराजवळ मशीदही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही.

दरम्यान, महागाई, बेरोजगारी (Inflation, unemployment) या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी मशिदीचे वाद निर्माण केले जात आहे. देशातील वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका शरद पवार यांनी केरळमधील मेळाव्यात केली. तसेच फेसबुक पोस्टमधूनही केंद्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.