….हे मूर्खपणाचे प्रयोग सरकारने थांबवावे, आमदारांना घर देण्याच्या निर्णयावर सरोदे बरसले

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी एक मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा (Homes For Mla) मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय.

महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे ते म्हणाले. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावं, आमदार असेपर्यंत.. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर सरकारवर टीका होऊ लागली आहे. आमदारांची कोट्यवधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7 ते 8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, आता याबाबत प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, आमदारांना घरे देण्याची घोषणा, मग सारवासारव व घरे विकत देणार असे सांगणे…..हे मूर्खपणाचे प्रयोग सरकारने थांबवावे. लोकनिधीचा वापर गरिबांसाठी करा. घोषणा झाली तेव्हा कोणत्याच राजकीय पक्षाने विरोध केला नाही. आता कदाचित करतील. सामान्य माणसांचे कुणाला काय पडले आहे?