शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होतंय; विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र व्हायरल 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधल्या पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू राहणार आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असतान दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याच व्यथा इयत्ता पाचवीतील एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनाच पत्र लिहून मांडल्या आहेत. सोलापूर येथील केंद्रीय विद्यालय, सेंट्रल रेल्वे या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहेत, ही व्यथा त्याने पत्रात व्यक्त केली आहे.

काय लिहिलंय पत्रात?

मी कौस्तुभ भूषण प्रभू. इयत्ता पाचवीच्या वर्षात केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे सोलापूर इथे शिकत आहे. तुम्ही आमच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात. पण ऑनलाइन शिक्षण खेडोपाड्यातील अनेक मुलांना ऑनलाइन सोयीसुविधा अभावी घेणे शक्य होत नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे गणित व विज्ञानासारखे विषय शिक्षक अनुभवी असले तरी शिकवण्याच्या मर्यादा पडतात. या विषयांचा आमचा शैक्षणिक पाया मजबूत होत नाही.

तुम्ही बोलला होता की सरसकट ठिकाणच्या शाळा आधी बंद करणार नाहीत, पण तुम्हीच आता सरसकट शाळा बंद करत आहात, तुम्ही तुमच्या निर्णयावरून असा अचानक मागे का घेत आहात. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत. तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे त्याने पत्रात म्हटले आहे.