मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र होते – राष्ट्रवादी

मुंबई – सर्वप्रथम सोमय्या यांनी राज्यपालांना आपल्याला झालेल्या गंभीर दुखापतीचा अहवाल सादर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( NCP State Chief Spokesperson Mahesh Tapase ) यांनी केली आहे. आज भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) राज्यपाल भेटीसाठी राजभवनात गेले होते त्यावर महेश तपासे यांनी ही मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांना कोणतीही गंभीर जखम झालेली नाही, असा साधारण अहवाल भाभा रुग्णालयाने सादर केला आहे. परंतु सोमय्या यांनी आपल्या जखमेचे चांगले व्हिज्युअल्स तयार करण्याचा प्रयत्न केला, अशी खोचक टीकाही महेश तपासे यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा कटकारस्थानांनी अस्थिर होणार नाही. राज्य सरकार पूर्णपणे भक्कम आहे. असे कितीही खोटेनाटे आरोप केले तरी यातून काहीही सिद्ध होणार नाही, असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

मुंबई शहरात काही दिवसापासून घडणाऱ्या सर्व नाट्यमय घडामोडींचे धागेदोरे कुठे पोहोचतात याची जनतेला चांगलीच जाणीव झाली आहे. राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात कोणत्याही चुकीच्या घटना घडणार नाहीत. राणा कुटुंब ज्या भाजप पक्षाचे समर्थन करतात त्याच पक्षातील माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे ( MLA Jayakumar Gore ) यांनी मागासवर्गीय समाजातील मयत पिराजी भिसे यांची खोटी कागदपत्रे तयार करून जमीन लाटण्याचा प्रकार महेश तपासे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिला. तसेच अशी फेरफार करणाऱ्या लोकांना तातडीने अटक व्हावी अशी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

नवनीत राणा यांनी या संदर्भातील तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे करण्याऐवजी मुंबई हायकोर्टात का केली नाही, असा सवाल महेश तपासे यांनी उपस्थित केला. केवळ मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी अशी तक्रार केल्याचा आरोप करतानाच यातून जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र होते. पण त्यांचे भांडे आता फुटले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

युसूफ लकडावाला ( Yusuf Lakdawala ) हा व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. तसेच त्याच्यावर ईडीकडून कारवाई सुरु असताना अशा व्यक्तीकडून एखादा लोकप्रतिनिधी ८० लाख रुपये घेतो. एवढे पैसे का घेण्यात आले, यामागे मनी लॉन्डरिंगचा भाग होता का, याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी करतानाच महाराष्ट्र राज्यातील राजकीय नेत्यांना केंद्रीय यंत्रणेकडून अडकविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्या प्रकरणात केंद्रीय यंत्रणा काय भूमिका घेते याकडे आमचे लक्ष आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांनी त्यांची हत्या झाल्यास राज्यसरकारला दोषी धरावे असे विधान केले. यावर बोलताना महेश तपासे यांनी सदावर्ते यांच्या कारनाम्यांचा पाढाच वाचून दाखवला. गुणरत्न सदावर्ते यांनी ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले, त्यातून महागड्या गाड्या घेतल्या, मयत एसटी कर्मचाऱ्यांना यातील काही पैसे देण्याऐवजी प्रॉपर्टीज घेतल्या. यावरही हा एसटी कर्मचाऱ्यांचा लढा आम्ही फुकट लढतोय असा आव त्यांनी आणला आहे. हे संयुक्तिक नाही अशी टीका महेश तपासे यांनी केली. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर लगेचच एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यानंतर लोक सदावर्तेंच्या थापांना बळी पडणार नाही, असा दावा महेश तपासे यांनी केला.