अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही,लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल ?

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत मोठे वादळ निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटाला ठाकरे गटातील नेते जाऊन मिळत असल्याने हा संघर्ष आणखी वाढला असून मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर आली आहे. यातच काल शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बोलताना सामंत म्हणाले, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही.

गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र असं सामंत यांनी म्हटले आहे.