चीनमधील ‘एव्हरग्रँडे’ कम्पनी दिवाळखोरीच्या वाटेने का जात आहे ?

विनीत वर्तक – एव्हरग्रँडे ही चीनची घरं बांधणारी कंपनी सध्या जगभर चर्चेचा विषय आहे. अमेरिकेच्या घरांचा फुगा जसा २००८ साली लेहमन ब्रदर्सच्या रूपाने फुटला आणि त्याचे आर्थिक हादरे संपूर्ण जगाला भोगावे लागले त्याच रस्त्यावर सध्या चीनमधील एव्हरग्रँडे वाटचाल करत आहे. एव्हरग्रँडे ही कंपनी नक्की काय करते? ती दिवाळखोरीच्या वाटेने जाण्यासाठी नक्की असं काय घडलं? या सर्वाचा चीन आणि जगावर काय परिणाम होणार हे जाणून घ्यायची गरज आहे. कोरोनानंतर पुन्हा चीन एव्हरग्रँडेच्या रूपाने जगातील अर्थव्यवस्थांना हादरे देणार असं बोललं जात आहे. एव्हरग्रँडेच्या रूपाने चीनचा एक पाय चिखलात खोल रुतत चालला आहे आणि येणाऱ्या काळात तो चीनच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीला खीळ ठोकणार आहे.

एव्हरग्रँडे ही चीन मधील घरं, वसाहती यांचं बांधकाम करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. १९९७ साली सुरू झालेल्या या कंपनीने अल्पावधीत चीनच्या जवळपास २८० शहरात आपले हातपाय पसरले. या कंपनीने १३०० पेक्षा जास्ती बिल्डिंग आणि वसाहतीचे बांधकाम पूर्ण केलेलं आहे. दोन लाखापेक्षा जास्ती लोक एव्हरग्रँडे कंपनीत नोकरीला आहेत. बांधकाम क्षेत्रात आपलं वर्चस्व कायम केल्यावर कंपनीने इतर क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवला. विमा, चित्रपट, खाद्य अश्या विविध क्षेत्रात कंपनी उतरली. अगदी इलेक्ट्रिक वाहननिर्मितीमध्ये २०१९ मध्ये या कंपनीने शिरकाव केला. पण या सगळ्या छान दिसणाऱ्या चित्राच्या मागे कंपनीने कर्जाचा डोंगर उभा केला होता. २०२१ उजाडेपर्यंत कर्जाचा हा डोंगर ३०० बिलियन (३०,००० कोटी) अमेरिकन डॉलरच्या पलीकडे गेला. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कंपनीने अजून कर्ज घेण्यास सुरूवात केली. जे घर अजून बांधल गेलेलं नाही ते आधीच विकायला सुरूवात केली. कर्जाचे पैसे उभे करण्यासाठी कागदावरची ही घरे २०% सवलतीसह ग्राहकांना देण्यास सुरूवात केली. तब्बल १५ लाख घरांवर इन्वेस्टर आणि ग्राहकांनी ती बनवली गेली नसताना आधीच एव्हरग्रँडेला पैसे देऊन मोकळे झाले.

कर्जाचा हा फुगा कधीतरी फुटणार ही काळ्या दगडावरची रेष होती. २०२१च्या मध्यावर कंपनीकडे घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नसल्याचं स्पष्ट झालं. २०२२ मध्ये कंपनीला तब्बल ७.४ बिलियन (७४० कोटी) अमेरिकन डॉलर इतक्या मोठ्या स्वरूपात कर्जाचा हप्ता द्यावा लागणार आहे. पण हे पैसे कुठून आणणार याबद्दल कंपनी उत्तर देण्यास असमर्थ असल्याने कंपनीत गुंतवणूक केलेल्या सर्वांनी आपले पैसे डुबण्यापासून वाचवण्यासाठी कंपनीमधून निर्गुंतवणूक करायला सुरूवात केली. या कंपनीचा शेअर जवळपास ८५% गडबडला. कंपनीवर दिवाळखोरीचे वादळ घोंगावू लागले. कंपनीने २५% सवलतीने घरं विकण्यास सुरूवात केली. पण लोकांचा विश्वास गमावल्यामुळे घराची विक्री होण्यापेक्षा ज्यांनी घर घेण्यासाठी पैसे गुंतवले होते त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावायला सुरूवात केली आहे. चीनच्या आर्थिक प्रगतीत झटपट पैसे कमावण्यासाठी अनेक चिनी लोकांनी यात आपल्या आयुष्याची कमाई गुंतवली होती. पण त्यांची आयुष्यभराची कमाई आता बुडीत खात्यात जमा होण्याच्या वाटेवर आहे.

चीनच्या आर्थिक प्रगतीत बांधकाम व्यवसायाचा वाटा जवळपास २९% आहे. त्याच बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेली एव्हरग्रँडे कंपनी जर दिवाळखोरीत गेली तर चीनच्या आर्थिक महत्वकांक्षेला हादरा बसणार आहे. या दिवाळखोरीचे परिणाम चीनपुरते मर्यादित न राहता त्याचा संपूर्ण जगावर अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडणार आहे. एव्हरग्रँडे कंपनीला लागणाऱ्या अनेक गोष्टींचा पुरवठा हा जगातील इतर देशांतून केला जात होता. साहजिक त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना याचा चटका बसणार आहे. भारतातून एव्हरग्रँडे कंपनीला स्टील, लोखंड यांचा पुरवठा होत होता. एव्हरग्रँडे दिवाळखोरीत गेल्यावर त्याचा फटका भारतातील स्टील उद्योगाला बसणार आहे. ३ ऑक्टोबर २०२१ ला एव्हरग्रँडेला हाँगकाँग शेअर बाजारात व्यवहार करण्यापासून निलंबित करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट एव्हरग्रँडेच्या रसातळाला जाण्याच्या प्रवासाकडे झालेली वाटचाल स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

एव्हरग्रँडेचं दिवाळखोरीत जाणं चीनला परवडणारं नाही. त्यामुळे चीनचं सरकार यात मध्यस्ती करून एव्हरग्रँडेला वाचवेल असा अनेकांचा कयास आहे. पण तूर्तास असं कोणतंही पाऊल चीन सरकारने उचललेलं नाही. पण जरी चीनने ते पाऊल टाकलं तरी एव्हरग्रँडे चिखलात रुतलेला चीनचा पाय हा चीनची प्रगती रोखणार हे स्पष्ट आहे. याचसोबत ज्या लोकांनी घराची स्वप्नं बघून पैसे गुंतवले होते त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होणार हे पण ठरलेलं आहे.

फोटो शोध सौजन्यः- गुगल

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

चाहत्यांनी ‘मलायका अरोरा’ची ‘चोरी’ पकडली…

Next Post
'अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे'

‘अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे’

Related Posts
RBI चा ५ बँकांना दणका! महाराष्ट्रातील 'या' बँकांचा समावेश; वाचा काय आहे कारण?

RBI चा ५ बँकांना दणका! महाराष्ट्रातील ‘या’ बँकांचा समावेश; वाचा काय आहे कारण?

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) देशातील 5 सहकारी बँकांवर नियमांविरोधात काम केल्याबद्दल आणि ग्राहकांना…
Read More
Devendra Fadnavis | मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? 

Devendra Fadnavis | मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? 

Devendra Fadnavis | राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि…
Read More
Prakash Ambedkar | भाजप- काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांनचा दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा

Prakash Ambedkar | भाजप- काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांनचा दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकांवर…
Read More