अजित पवारांवर भाजपाकडून दबाव टाकण्यात येत आहे, त्यांच्या भाषणातून हे स्पष्ट जाणवतंय
Vidya Chavan On Ajit Pawar: अजित पवार यांच्या मित्र मंडळांचे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये अजित यांची अस्वस्थता भाषणांमधून दिसून आली आहे. अजित पवारांवर भाजपकडून ज्या प्रकारे दबाव टाकण्यात येत आहे. तो दबाव अजित यांच्या भाषणातून दिसून येत होता. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून अजित यांना भाषणाची स्क्रिप्ट लिहून देण्यात आली होती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी केले.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीची रंगीत तालीम अजित यांच्या कालच्या मित्रमंडळ शिबिरातून दिसून आली आहे. अजित यांनी केलेले भाषण हे पूर्णपणे भाजपकडून दबाव टाकण्यात येत असल्याने करण्यात आले आहे. भाषणात अजित बोलत असले तरी संपूर्ण भाषण भाजपच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असून सुद्धा महाराष्ट्र सध्या अस्वस्थ झाला आहे. गारपिटीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना सुद्धा शेतकर्यांना मदत करणे आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवणे हे जटिल होत असल्याने अजित यांची अस्वस्थता वाढत चालली आहे, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, राज्यामध्ये सध्या अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेला शेतकरी, मराठा, ओबीसी आरक्षणामुळे राज्यात सुरू असलेले वादळ या सर्व प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अजित यांना भाजपकडून मित्र मंडळ शिबिरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीवर बोलण्यास भाजपकडून सांगण्यात आले.
विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या, अजितदादा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे अजितदादा यांना जर खरेच काही वेगळे करायचे असते तर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रमाणे स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करायला पाहिजे होता. राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे, त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे असताना पक्षावर दावा करून पक्ष बळकवण्याचे काम अजितदादा करत आहेत, हे अशोभनीय आहे. यातूनच अजित यांची अस्वस्थता दिसून येत आहे, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या.
अजित पवारांच्या भाजप धोरणाबाबत विद्या चव्हाण म्हणाल्या, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने धाडी टाकण्यात आल्यानंतर या सर्वांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. अजितदादा यांच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध राहिला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वात भ्रष्ट पार्टी असल्याचे वक्तव्य केले होते आणि त्यानंतर दोन चार दिवसातच हे सर्व लोक भाजपसोबत सत्तेत गेले. अजित त्यामुळेच तिकडे गेले, हे यावरून दिसून येत आहे.
विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की, ते लोक विचार सोडून विचारधारे विरुद्ध असलेल्या पक्षांसोबत गेले. भाजपकडे कोणाचाही विचार चालत नाही. भाजप म्हणेल तो विचार आणि तेच भाजप सोबत गेलेल्या व्यक्तींना बोलावे लागते. त्यामुळेच अजित यांची घुसमूट दिसून आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी पवार यांनी दिलेला राजीनामा काही लोकांच्या सांगण्यावरून आणि राजकीय दृष्टिकोनातून देण्यात आला होता आणि त्यानंतर परत घेण्यात आला होता, असा आरोप काल अजित यांनी केला आहे. हा पूर्णपणे खोटा आणि चुकीचा आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवार यांनी राजीनामा मागे घेतला होता, असे विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केले.
संघर्ष यात्रा आ. रोहित पवार यांनी युवकांचे प्रश्न आणि शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काढली आहे. ही यात्रा ज्या-ज्या भागातून जात आहे त्या परिसरामध्ये यात्रेला मोठ्या प्रमाणात युवक, शेतकरी आणि स्थानिक लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेऊन सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आमदार रोहित पवार करत आहेत. जर कोणी सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असेल तर त्याचे मोठ्या मनाने कौतुक करायला पाहिजे. पण तो मोठेपणा जर तुमच्याकडे नसेल तर किमान नावे तरी ठेवू नयेत, असा विद्याताई चव्हाण यांनी अजित यांना टोला लगावला आहे.
भुजबळ हे आज ओबीसीचे नेते असल्याचा आव आणत आहेत. त्यांनी रीडर्सच्या मोर्चावेळी गोमूत्र शिंपडून हुतात्मा चौकाची ती जागा पवित्र केली होती, हे विसरुन चालणर नाही. महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद सुरु आहे तो वाढवण्याचा कट सुरु आहे, असा आरोप देखील विद्या चव्हाण यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”