‘बा पांडुरंगा …  राज्यावरचं बेरोजगारीचं… महागाईचं संकट दूर कर… बळीराजाला यश दे’

मुंबई – राज्यात यंदाही पाऊसपाणी चांगलं होऊ दे… शेतकऱ्याच्या शिवारात पिकपाण्याची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे… राज्यावरचं बेरोजगारीचं, महागाईचं संकट दूर कर… या राज्यातल्या बळीराजाला यश दे. त्याच्यासह राज्यातला प्रत्येक जण निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी राहूदे…महाराष्ट्राच्या विकासाची, विठ्ठलभक्तीची, संतपरंपरेची, अध्यात्माची पताका यापुढेही अशीच उंच फडकत राहूदे, असं साकडं विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of the Opposition Ajit Pawar) यांनी बा पांडुरंगाला घातलं आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या, माता रुक्मिणीदेवींच्या चरणी वंदन केलं असून श्रीविठ्ठलभक्तीनं न्हाऊन निघालेल्या, बा पांडुरंगाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचं अंतर पायी चालून पंढरपूरला पोहोचलेल्या वारकरी माऊलींनाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भक्तीपूर्ण वंदन केलं आहे. राज्यातील नागरिकांनाही त्यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आषाढी एकादशीनिनिमित्तानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी राज्याच्या कल्याणासाठी साकडं घातलं आहे. राज्यावरचं, देशावरचं कोरोनाचं संकट कमी केल्याबद्दल अजित पवार यांनी बा पांडुरंगाचं आभार मानले असून श्रीविठ्ठलभक्तीची, एकतेची, समतेची, पंढरपूरच्या वारीची परंपरा ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ताकद असून ही परंपरा यापुढे शेकडो वर्षे अशीच अखंड सुरु राहील, असा विश्वासही राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.