“स्वामींची शक्ती विलक्षण आहे”; अभिनेत्री अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा अनुभव

Amruta Khanvilkar: मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर ‘गणराज गजानन’ (Ganraj Gajanan) या नवीन गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘गणराज गजानन’ या गाण्याच्या प्रमोशननिमित्ताने अमृता सध्या टेलीव्हिजनवरील काही कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच एंटरटेन्मेंट मीडियाशी देखील या गाण्याच्यानिमित्ताने ती संवाद साधत आहे. नुकतंच अमृता स्वामी समर्थांच्या (Swami Samarth) प्रचिती विषयी बोलली.

‘गणराज गजानन’ या गाण्यानिमित्ताने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला अमृता खानविलकरने मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘तुझ्या आयुष्यात स्वामींचं किती महत्त्व आहे?’ यावर अमृता म्हणाली की, “मला असं वाटतं ज्यांना आयुष्यात खूप चमत्कार बघायचे असतात ना. तर ते स्वामी चरणी जातात आणि स्वामी बोलवून घेतात. तुम्ही फक्त त्यांचा जप करा. त्याचं असं काहीच नसतं की, खूप मोठी पूजा वगैरे घाला. तुम्ही जितकं स्वामीचं मनाने करालं, तितकं आहे. माझ्या पडत्या आणि माझ्या अवघड काळात स्वामींनी मला बोलवून घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही.”

पुढे अमृता म्हणाली की, “मी जिकडे राहत होती, अगदी तिकडेच काही अंतरावर स्वामी समर्थांचं मठ होतं. मी अनेकवर्ष दररोज मठात गेलीये. त्यांची जी शक्ती आहे, ती विलक्षण आहे. ती फक्त तुम्ही अनुभवू शकता. ती सांगू शकत नाही. माझ्याबरोबर काय झालं? मला त्यांनी कुठल्या गोष्टींमधून बाहेर काढलंय?, असं सांगता येत नाही. स्वामींची शक्ती फक्त जाणवू शकते.”