मराठा समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध,हीच दिवंगत मेटे यांना श्रद्धांजली – शिंदे

बीड – मराठा समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा ध्यास होता. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी स्व मेटे यांनी सतत प्रयत्न केले. मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी, त्यांच्या उन्नती, प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. मराठा समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिवंगत यांना श्रद्धांजली वाहिली.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे दि. 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन (Accidental death) झाले. त्यांच्या पार्थिवावर काल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale), पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतूल सावे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यांच्यासह खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खा. इम्तियाज जलिल, यांची प्रमुख उपस्थिती होती.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन ही अविश्वसनीय, मनाला न पटणारी, मनाला चटका लावणारी,अप्रिय, दुःखद, वेदनादायी घटना असल्याचे सांगून श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही माणसं कुटुंबाप्रति मर्यादित नसतात, त्यांची समाजासाठी काही तरी करण्याची तळमळ असते. मराठा समाज व शिवसंग्राम हा त्यांचा परिवार होता. त्यांचा एकच ध्यास होता तो म्हणजे मराठा समाज आरक्षण सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी दिवंगत मेटे यांनी सतत प्रयत्न केले. त्यासाठी जे जे करावं लागेल, ते सरकार करेल हा सरकारचा शब्द आहे. आमचे सरकार मराठा समाजाला नक्की न्याय देईल. दिवंगत मेटे देह रूपाने नसले तरी त्यांचे कार्य, संघर्ष चिरंतन आहे. त्यांच्या जाण्याचं दुःख पचविण्याची शक्ती, ताकद देव त्यांच्या कुटुंबियांना देवो. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे ते म्हणाले.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन हा आपल्यासाठी दुःखद प्रसंग असून, आज आपल्याला शब्द सुचत नाहीत. ही आपली वैयक्तिक हानी असल्याच्या भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाज, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, अरबी समुद्रातील शिवस्मारक असे एक एक विषय मार्गी लावण्याचा दिवंगत मेटे यांचा प्रयत्न होता. शिवसंग्राममधून त्यांनी सामान्य तरुणाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी जे काम हाती घेतले, ते पूर्ण करण्याचा संकल्प आज करत आहोत, असे सांगून हा प्रसंग सहन करण्याची शक्ती त्यांच्या वैयक्तिक व शिवसंग्राम च्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे ते म्हणाले.