पराभव समोर दिसत असल्यानेच राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या : किसान सभा

नगर – पावसाचे कारण देत राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती (Postponement of Co-operative Societies Elections) देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यभरात वेगवेगळ्या कारणाने अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आलेले आहेत. आता सुरु असलेल्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. अनेक संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये अचानक निवडणुका पुढे ढकलल्या ही अत्यंत लोकशाहीविरोधी कृती आहे. हा सत्तेचाही दुरुपयोग आहे.असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांनी केला आहे.

राज्यभरातील अनेक सहकारी संस्थांमध्ये भाजपला (BJP) आपला पराभव दिसत असल्यामुळेच शिंदे भाजपा सरकारने हा लोकशाही विरोधी निर्णय घेतलेला आहे. किसान सभेच्या वतीने राज्य सरकारच्या या निर्णयाचा आम्ही धिक्कार करत आहोत.

राज्य सरकारने तातडीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा व सहकारी संस्थेत लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन किसान सभेच्या वतीने राज्य सरकारला करत आहोत.असं देखील ते म्हणाले.