जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

पुणे -राज्य शासनाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून नुकतीच या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली.

बैठकीस उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सुजाता हांडे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी अभियानाच्या बालबद्ध आराखड्यास बैठकीत मान्यता दिली. अटल भूजल योजनेतील आणि टँकरग्रस्त गावे प्राधान्याने घेण्यात यावीत. अभियानाला गती देण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करून गावांची निवड करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जलसंधारण अधिकारी ऋतुजा ढगे यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० बाबत माहिती दिली. यावेळी पाणलोट विकासाची कामे पूर्ण झालेली गावे, अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कामांची व्याप्ती, गाव आराखडा, घेण्यात येणारी कामे, कामांसाठी मान्यता, कामांचा प्राधान्यक्रम, जलपरिपूर्णता अहवाल, जलसाक्षरता व प्रशिक्षण आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.