राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ‘एकनिष्ठतेची मोहीम’

पवार साहेबांच्या साथीने कष्टक-या महाराष्ट्राचा आवाज आणखी बुलंद होणार

मुंबई- “गेल्या काही महिन्यांमध्ये लाचार होऊन केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशांना घाबरून पक्षातील काही जणांनी सत्तेसोबत जाण्याची भूमिका स्विकारली. पक्षविरोधी भूमिका स्विकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षा अशा व्यक्तींचे समर्थन करत नाही. पुरोगामी विचारांना बगल देत सत्तेसाठी लाचार झालेल्यांना महाराष्ट्रातील जनता चांगलाच धडा शिकवणार यात तिळमात्र शंका नाही. कारण महाराष्ट्राची जनता ही भित्र्या राज्यकर्त्यांसोबत नाही तर समग्र महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणा-या निधड्या छातीने सह्याद्रीसारख्या लढणा-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्याा दूरगामी विचारांना साथ देणारी आहे. जनतेच्या याच विश्वासाला अधिक ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ‘एकनिष्ठतेची मोहीम’ राबवण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राबवण्यात येणा-या या एकनिष्ठतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सदस्याला 7030120012 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. हा मिस्ड कॉल दिल्यानंतर सदस्याला त्याच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसव्दारे एक लिंक प्राप्त होईल. या लिंकच्या माध्यमातून सदस्याला स्वतःची वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे. माहिती नोंदवल्यानंतर सदर सदस्याची नोंद होऊन सदस्याचे अधिकृत डिजीटल कार्ड डाऊनलोड होईल. अशी ही एकनिष्ठतेची मोहीम गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

“येत्या काळात होणा-या निवडणुकांच्या दृष्टीकोनातून आदरणीय शरद पवार साहेबांच्या साथीने राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी एकनिष्ठतेची मोहीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राबवण्यात येत आहे. या मोहिमेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत असून संपूर्ण महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असलेला विश्वास स्पष्ट होत आहे.” असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले.