ओबीसी आरक्षणात मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला त्याचपध्दतीने महाराष्ट्राला न्याय मिळेल – मुंडे

मुंबई – ओबीसी आरक्षणात मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला त्याचपध्दतीने महाराष्ट्राला न्याय मिळेल असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला. जनता दरबारासाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता ओबीसी आरक्षणाबाबत माध्यमांनी धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधला.

ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी मागच्या पाच वर्षात काहीतरी केलं असतं तर १२ कोटी जनतेला भाजप विषयी विश्वास पटला असता असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना ओबीसी आरक्षणाचे प्रकरण कोर्टात सुरू होते त्यावेळी तत्कालीन भाजपच्या सरकारने काय केलं तर यामध्ये तत्कालीन भाजप सरकार अपयशी ठरले आहे असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा निकाल लागला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आघाडी सरकार करत आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

न्यायालयात साक्षीपुरावे करत असताना इंपिरिकल डाटा, अहवाल किंवा ट्रिपल टेस्ट करण्यासंदर्भात तत्कालीन भाजप सरकारने काय केले तर काहीच नाही म्हणून तर आमच्या सरकारच्या काळात निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आघाडी सरकार काम करत आहे असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.