पवारसाहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने पवारसाहेब पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही – मलिक

मुंबई – पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करत आहेत… देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होतात त्यावेळी १९८४ साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

ही लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले. पवारसाहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने पवारसाहेब पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही उलट पवारसाहेब देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत. विरोधकांच्या एकीमुळे मोदीसरकार सत्तेबाहेर जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.