शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

Narayan Rane:- अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. रामललाच्या अभिषेक कार्यक्रमात शंकराचार्यांनी सहभाग न घेतल्याचा मुद्दाही देशात गाजत आहे. मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली तर मूर्तीमध्ये भूत, प्रेत सामावण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. शकराचार्यांनीदेखील याबाबत भाष्य केलं. यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांना फटकारले आहे.

“शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी? म्हणजे शंकराचार्य आमच्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नाहीय तर धार्मिकतेने होत आहे. राम आमचं दैवत आहेत. त्यासाठीच हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यातील हिंदू धर्मासाठी असलेले योगदान सांगावं. जे रामांनी हिंदू धर्माला योगदान दिलं तसं शंकराचार्यांनी सांगावं”, असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणेंच्या या वक्तव्यावर विविध माध्यमातून प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकच्या साधू महंतांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सरसकट शंकराचार्यांचा अपमान नाही
काही शंकराचार्य जाणीवपूर्वक राम जन्मभूमी बाबत वक्तव्य करत आहेत. मंदिर पूर्ण होण्याआधीच प्राणप्रतिष्ठा केली जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र तसे नाहीये, मंदिराचे शिखरापर्यंत काम झालेले आहे. हे जर समजत नसेल तर शंकराचार्य राजकीय बोलत आहेत. राजकीय स्टेटमेंट करणाऱ्या शंकराचार्यांबाबत नारायण राणे बोलले. त्यामुळे नारायण राणे यांनी सरसकट शंकराचार्यांचा अपमान केला, असे म्हणणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी (Sudhirdas Pujari) यांनी दिली.

शंकराचार्यांचं कार्य राणेंनी समजून घ्यायला हवं
शंकराचार्यांचे सनातन हिंदू धर्मासाठीचे कार्य अतुलनीय आहे. धर्मासाठी केलेले कार्य नारायण राणे यांनी समजून घेतले पाहिजे. नारायण राणे यांच्या शब्दाचा विपर्यास केला जात आहे. नारायण राणे हे सुद्धा हिंदू धर्माचे पाईक आहेत, अशी प्रतिक्रिया धर्म अभ्यासक महंत अनिकेत शास्त्री यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभाला जाऊ नका असं का म्हणाले होते नेहरू?

3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

राम मंदिराबाबत लालकृष्ण अडवाणींचे महत्त्वाचे विधान, ‘नियतीने ठरवले होते…’