अजित पवारांच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही, पण…; सुप्रियाताईंनी अखेर आपल्या भावना व्यक्त केल्याच

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान,शरद पवार ज्या वैचारिक भूमिकेची मांडणी करत होते ती एवढी कमकुवत आहे का असा सवाल उपस्थित होत असून अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या या निर्णयामागे शरद पवार आहेत, अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र खा. सुप्रिया सुळेंनी या सर्व चर्चांचे खंडन केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या या निर्णयाची शरद पवारांनाही काहीच कल्पना नव्हती. जर पवार साहेबांना याची पुसटशीही कल्पना असती तर पवार साहेबांनी पक्षपुनर्बांधणीची मोहिम सुरू केली नसती. बंड केलेल्या नेत्यांविरोधात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंविरोधात कारवाई सुरू केली नसती. असं त्या म्हणाल्या.

अजित पवारांच्या या निर्णयामुळे मी निराश झाले आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, पण त्यांना शरद पवारांना कधीच अंधारात ठेवले नाही. शरद पवारांची भेट घेऊन संघटना सोडण्याचे कारण सांगितले. शरद पवारांनी देखील त्यांना रोखले नाही. अजित पवारांच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही, पण मला धक्का बसला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.