‘हनुमान चालीसा लावल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्याला अटक होत असेल तर मस्जिदीच्या मौलवींनाही अटक केली पाहीजे’

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील (masjid) बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे. दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा लावला जाणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे.

विशेष म्हणजे रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केला आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, हनुमान चालीसा लावणाऱ्या मनसेच्या काही कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली होती.

दरम्यान, आता याच मुद्यावरून भाजयुमोचे प्रदीप गावडे (Pradip Gavade) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लाऊड स्पीकर वर हनुमान चालीसा लावल्यामुळे मनसे च्या पदाधिकाऱ्याला अटक केल्याचे वृत्त आहे, असे असेल तर सर्व मस्जिदीच्या मौलवींना ही लाऊड स्पीकर वर वारंवार अजान लावण्यासाठी अटक केली पाहीजे, राज्यात कायदा फक्त हिंदूंसाठीच आहे का..? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.