पूराने धोका निर्माण झालेल्या नद्यांमधील जलसंपदा विभागाची गाळ उपसा मोहीम

रत्नागिरी – राज्यसरकारच्या जलसंपदा विभागाची संपूर्ण यंत्रणा चिपळूण, महाड येथील नद्यांचा गाळ काढण्यासाठी झोकून काम करत असून जलसंपदा विभाग हे गाळ उपसा उदिष्ट पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करतानाच चिपळूण – महाड वासियांना येत्या काळात पूराचा सामना करावा लागणार नाही अशी खबरदारी घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राज्याच्या जलसंपदा विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदी व शिव नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. आज चिपळूण येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

गेल्यावर्षी रायगड, महाड, चिपळूण आणि आजुबाजूच्या परिसरात अतिवृष्टी झाली आणि या तालुक्यांना पूराचा मोठा सामना करावा लागला. या भागातील नद्यांमध्ये साचलेला गाळ हा पूर येण्याच्या विविध कारणांपैकी एक कारण आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पूर टाळता यावा म्हणून आम्ही गाळ उपसा करण्याची ही भूमिका घेतली असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत ४ लाख क्युबीक मीटर गाळ काढला गेला आहे तर पावणे आठ लाख क्युबीक मीटर गाळ काढण्याचे आमचे उदिष्ट आहे. या कामासाठी आतापर्यंत १२ फोकलेन काम करत होते तर आता अधिकचे १४ फोकलेन आणि ३० टीपर आणले गेले आहेत. चिपळूणबरोबरच महाडमध्येही हे काम कार्यरत राहिल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.