सातत्याने वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणार की स्वागताला जाणार?

मुंबई – सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करणार की, त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेच्या स्वागताला जाणार, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांना केला आहे.

राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. वीर सावरकरांना इंग्रजांचे हस्तक, इंग्रजांकडून पैसा घेणारे असे राहुल गांधी संबोधतात. आम्ही राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. वीर सावरकर यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात भारतातील जनता आहे. स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय परिस्थितीत जाणीवपूर्वक वीर सावरकरांना अपमानित करण्याचे काम केले गेले. आम्ही सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करतो. पण, अंदमान कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले फार थोडे आहेत. वीर सावरकरांनी अनेकांना क्रांतीची प्रेरणा दिली. राहुल गांधी यांना काँग्रेसचा इतिहास माहिती नाही, स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही. आता अशा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताला उद्धव ठाकरे नेते पाठविणार की हिंमत दाखवून वीर सावरकरांच्या अपमानाचा निषेध करणार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, कोणताही अहवाल सादर होतो, तेव्हा तो पुराव्यांच्या आधारावर होतो. तत्कालिन पोलिस आयुक्त आणि पोलिस महासंचालक यांना हाताशी धरुन कुंभाड रचण्यात आले. याचे अनेक पुरावे बाहेर आले आणि आणखी पुढच्या काळात येणार आहेत. पोलिस पुराव्यांच्या आधारावर काम करत असते आणि न्यायालय कायद्यानुसार निर्णय घेते. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यावर अन्याय करणार नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्यावर अकारण अन्याय होऊ देणार नाही.

विजय देशमुख यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात पीएफआयच्या बंदीचा उल्लेख आहे. इतरही नेत्यांची सुद्धा नावे आहेत. त्यासंदर्भात पोलिसांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत आणि पोलिस त्याची सखोल चौकशी करीत आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नाशिकचा अपघात दुर्दैवी आहे. राज्य सरकार संपूर्ण मदत करते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत सुद्धा जाहीर केली आहे. अपघाताची चौकशी सुद्धा होते आहे. असे अपघात भविष्यात होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी हा अतिशय प्रोफेशनल पक्ष आहे. त्यांनी पद्धतशीरपणे शिवसेनेला कमजोर केले. नंतर तो पक्ष फुटण्यास बाध्य केले आणि आता ती रिक्त जागा प्राप्त करण्याचा प्रयत्न करते आहे. पण, हिंदुत्त्वाला मानणारे जे मतदार आहेत, त्यांच्या सिद्धांतांच्या विरोधात राष्ट्रवादी सातत्याने काम करीत असल्याने ती रिक्त जागा राष्ट्रवादी भरून काढेल, असे मला वाटत नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.