योगींच्या गोरखपूर मध्ये सभा घेऊन गोरखपूर बदलायला गेले होते पण ..

मुंबई – चार राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाचा जल्लोष आज प्रदेश कार्यालयासमोर ढोलताशांच्या गजरात करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना मोदी है तो मुंबई भी मुमकिन है, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालया समोर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेतृत्वाखाली जोरदार जल्लोष करण्यात आला, यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. तर  चार राज्यात मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे तसेच गोव्याच्या यशाची रणनीती आखणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी अँड शेलार म्हणाले की, 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार…उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो..उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा… अशांसह बोरु बहाद्दर मोठ्या वल्गना करीत होते. पण सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल होऊन शिवसेना हारली. याबाबत मालवणीत टोला लगावताना म्हणाले की शिवसेनेची अवस्था “एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी झाली आहे. तर नोटा पेक्षा कमी मते घेऊन शिवसेना पराभव झाला हेही त्यांनी अधोरेखित केले. गोरखपूर मध्ये सभा घेऊन गोरखपूर बदलायला गेले होते जे  मुंबईचे गोरेगाव बदलू शकले नाहीत ते गोरखपूर काय बदलणार? असा खोचक टोलाही त्यांनी लगालवा.

तर ट्विट मध्ये आशिष शेलार यांनी म्हटले की, मा. अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील…शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात..आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ, अशा शब्दांत टीका केली आहे.