महाविकास आघाडीची जोरदार घोषणाबाजी अन् अवघ्या २२ सेकंदात राज्यपालांनी सभागृह सोडलं 

मुंबई : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले अभिभाषण काही मिनिटातच आटोपतं घेतलं. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनीच घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अभिभाषण आटोपतं घेतलं. अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आटोपतं घेत पटलावर ठेवले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषणासाठी सभागृहात येताच सत्ताधारी नेत्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर राज्यपाल यांनी अवघ्या 22 सेकंदात भाषण पटलावर ठेवत थांबवलं. त्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली.

तर, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली जात आहे. काल दोन्ही बाजूंकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांची बैठकही मुंबईत झाली. या बैठकीत भाजपनं अधिवेशनाची रणनीती आखली असून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.