दोन्ही काँग्रेससोबत गेल्याने ठाकरेंचे अस्तित्व संपले; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

कोल्हापूर – भाजपासोबतच्या (BJP) युतीत आमची 25 वर्षे सडली, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले होते. सत्यता अशी आहे की, दोन्ही कॉंग्रेससोबत (Congress) गेल्यावर ठाकरे यांचे अस्तित्व संपले आहे. कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाल्यास, पुन्हा राजकारणात उठता येणार नाही, असे आम्ही त्यांना चीतपट केले असल्याचा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी येथे केला.

कोल्हापुरात एकदा रणिंशग फुंकले की, त्याचा वणवा राज्यभर पेटत असल्याचा आमचा अनुभव आहे. म्हणूनच भाजपा-शिवसेनेच्या विजयी मेळाव्याची सुरुवात कोल्हापुरातून केली जात आहे. गेल्या निवडणुकीत युतीच्या प्रचाराचा प्रारंभही आम्ही कोल्हापुरातून केला होता आणि युतीला 41 जागा मिळाल्या. तेच लक्ष्य घेऊन आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.

लोकसभेत चांगले यश मिळाले. परंतु, विधानसभा निवडणुकीत थोडी गडबड झाल्याने पुरेेसे यश मिळाले नाही. त्याची दुरुस्ती या निवडणुकीत करायची आहे, हे ध्येय लक्षात घेऊन मैदानात उतरायचे आहे. निकालानंतर विजयी मेळावा कोल्हापुरातच घेऊ, असे फडणवीस यांनी विजयी मेळाव्यात सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.