‘देशातील दहा टॉप मुख्यमंत्र्यांमध्येही एकनाथ शिंदे नाहीत ;जनतेचा कौल कोणत्या दिशेने, लक्षात घ्या…’

मुंबई – ‘इंडिया टूडे सी वोटर मुड अॉफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे – फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा ४० च्या आसपास जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

आज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना हे मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दबावतंत्राचे राजकारण करुन सरकार काबीज केले ते जनतेला रुचलेले नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील तेव्हा ‘दुध का दुध आणि पानी का पानी’ होऊन जाईल असेही महेश तपासे म्हणाले.

उध्दव ठाकरे यांची कामगिरी महाविकास आघाडी सरकारमध्ये उजवी ठरली होती त्यामुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे यांना स्थान मिळवता आले मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना दहामध्येही स्थान मिळवता आले नाही याचा अर्थ जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट होत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

‘सी वोटरचा’ जो सर्व्हे आला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना फक्त दोन टक्के लोकांनी पसंती दिली याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर हे उध्दव ठाकरे यांचे नवीन मित्र झाले आहेत. मात्र देशपातळीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांच्या मोर्चाचे शरद पवारसाहेब हे नेतृत्व करत आहेत. जातीयवादाच्या विरोधातील हा मोर्चा असून यामध्ये पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे त्यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य भाजपविरोधात असेल अशी अपेक्षा महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.